मुंबई हे नाव मुंबा किंवा महा अंबा या देवीच्या नावावरून पडले आहे. मुंबा किंवा महा अंबा आणि आई म्हणजे देवी याचे एकत्रीकरण होऊन मुंबई असे नाव या नगरीला प्राप्त झाले.


आताची मुंबई ही सात बेटांवर वसली आहे. अगदी पाषाण युगापासून येथे वस्ती असल्याचे पुरावे आहेत. मुंबईवर मौर्य राजांनीही राज्य केले. अशोकाच्या प्रचंड साम्राज्याचा मुंबई एक भाग होती. नंतरच्या काळात सातवाहनांनीही मुंबईवर ताबा मिळविला. १३४३ पर्यंत शिलाहार राजांनी मुंबई आपल्या ताब्यात राखली. पण त्यानंतर गुजरातच्या शहाकडे मुंबईची सत्ता गेली.


पोर्तुगीजांचे मुंबईत आगमन १५३४ साली झाले. त्यांनी गुजरातच्या बहादूर शहाकडे या बेटाची मागणी केली होती. बहादूरशहाने बिनदिक्कत ही बेटे त्यांच्या ताब्यात दिली. पुढे पोर्तुगीजांनी इंग्लडचा राजा चार्ल्स दुसरा याला हुंड्यात चक्क हे बेट आंदण म्हणून दिले. या राजाने पोर्तुगीज राजाच्या मुलीशी लग्न केलं म्हणून त्याला त्यांनी ही भेट दिली. पुढे ब्रिटिश इस्ट इडिया कंपनीने हे बेट राजाकडून १६६८ मध्ये दहा पौंडाच्या वार्षिक भाड्याने आपल्या ताब्यात घेतले. पुढे ब्रिटिशांनीच मुंबईचा खर्या अर्थाने विकास केला. पोर्तुगीजांनीच मुंबईचे बॉम्बे केले. अर्थात ते त्याला Bombaim असे म्हणत. पुढे इंग्रजांनी त्याचे Bombay केले.


ब्रिटिशांना तत्कालीन उपखंडात आपले बंदर विकसित करायचे होते, त्यांना मुंबई त्यासाठी अगदी योग्य वाटली. म्हणून त्यांनी सूरतहून आपले मुख्यालय मुंबईला हलविले. मुंबईमध्ये बाहेरचे लोक येण्यास सुरवात झाली ती यावेळेपासून.


ब्रिटिशांच्या या निर्णयामुळे मुंबईची लोकसंख्या अगदी फटाफट वाढली. १६६१ मध्ये दहा हजाराची लोकसंख्या १६७५ मध्ये साठ हजारांवर जाऊन पोहोचली. ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचे हे मुख्यालय पुढे संपूर्ण देशाचा कारभार ब्रिटनच्या राणीच्या हातात गेल्यानंतरही बॉम्बे प्रेसिडेन्सीची राजधानी म्हणून कायम राहिले. ब्रिटिशांच्या ताब्यात हे शहर गेल्यानंतर त्यांनी त्याची सुव्यवस्थित रचना केली. अतिशय कलात्मक अशा इमारती उभारल्या.


१८५३ मध्ये स्थानिक रहिवाशांच्या दृष्टिकोनातून एक आक्रित घडलं. मुंबई ते ठाणे या दरम्यान त्यावेळी पहिली रेल्वे धावली. अमेरिकेचे नागरि युद्ध सुरू असताना मुंबई जगातील कापड व्यवहाराचे एक प्रमुख केंद्र बनली होती. १९०६ मध्ये मुंबईची लोकसंख्या दहा लाखावर गेली होती. तत्कालीन कोलकत्यानंतर सर्वांत जास्त लोकसंख्येचे हे शहर होते. पुढे ब्रिटिशांविरोधात भारतीय जनतेचा लढा सुरू झाला, त्यावेळी या सगळ्या चळवळीचे केंद्र मुंबईच होते. महात्मा गांधींनी भारत छोडो ही चळवळ मुंबईच्या गवालिया टॅंक आताचे आझाद मैदान येथून केली होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई राज्याची मुंबई ही राजधानी बनली.


१९५५ मध्ये मुंबई राज्याची पुनर्रचना होऊन महाराष्ट्र व गुजरात असे त्याचे भाग करण्यात आले. त्यावेळी मुंबई शहर हे स्वायत्त शहर करावे अशीही एक मागणी होती. पण संयुक्त महाराष्ट्र समितीने मुंबईची मागणी लावून धरली. त्यासाठी मोठी चळवळ सुरू केली त्यासाठी १०५ जणांनी आपले प्राण दिले. त्यांनी दिलेल्या प्राणामुळेच १ मे १९६० मध्ये अखेर मुंबई महाराष्ट्रात आली.


मुंबई महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही. हेच घोषवाक्य आंदोलनकर्त्यांच्या  तोंडात होतं. भाषिक राज्यांची निर्मिती करताना मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यासाठी हा लढा देण्यात आला. या लढ्यामध्ये १०५ जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मात्र, या लढ्यामध्ये १०५ हुतात्म्यांपेक्षाही अनेकांनी आपले प्राण मुंबईसाठी अर्पण केले आहेत. त्यांची कुठेही वाच्यता होताना दिसत नाही. ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले त्यांच्या कुटुंबियांच्या हाती देखील अद्याप काहीही लागले नाही. मुंबईसह महाराष्ट्राची मागणी करणार्‍या आंदोलनाची माहिती देखील आजच्या युवा पिढीला नाही. ही खेदाची बाब आहे. आपल्याला मुंबईचा सोडून सर्व इतिहास माहित आहे. त्या इतिहासावर आपण नेहमी चर्चाही करत असतो. मात्र, ज्या मुंबईत आपण वाढलोलहानाचे मोठे झालो. त्या मुंबईच्या इतिहासाबद्दल आपल्याकडे कोणतीही ठोस माहिती नसावी. हे एक मुंबईकर म्हणून लाजिरवाणीबाब आहे.

मराठी भाषिकांची आणि मुख्यत्वे कोळी बांधवांच्या हक्काची असलेली मुंबई तोडून तिचे दुसर्‍या राज्यामध्ये विलनीकरण्यास विरोध करणार्‍या आंदोलकांनी आपल्या जीवाचे रान करुन मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी बलिदान दिले. त्या बलिदानाची जाणीव आणि मराठीचे आणि पर्यायाने मराठी माणसाचे अस्तित्त्व टिकविण्यासाठी मराठी माणसानेच आता तरी जागे होणे गरजेचे आहे. आता जर का मराठी माणूस जागा झाला नाही तर त्याला कोणीही वाचवू शकणार नाही.


जय महाराष्ट्र … सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!





टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top