श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा करतात. या दिवशी तांदुळ, सोने व पांढर्‍या मोहर्‍या पुरचुंडीत एकत्र बांधल्याने रक्षा अर्थात् राखी तयार होते.
येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल: ।
तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल ।।
अर्थ : महाबली व दानवेन्द्र असा जो बली राजा जिने बद्ध झाला, त्या रक्षेने मी तुलाही बांधतो. हे राखी, तू चलित होऊ नकोस.
            राखी ही बहिणीने भावाच्या हातात बांधायची असते आणि त्यामागे भावाचा उत्कर्ष व्हावा व भावाने बहिणीचे संरक्षण करावे ही भूमिका असते. बहिणीने भावाला राखी बांधण्याहून जास्त महत्त्वाचे आहे, एखाद्या तरुणाने किंवा पुरुषाने एखाद्या तरुणीकडून किंवा स्त्रीकडून राखी बांधून घेणे. त्यामुळे त्यांचा, विशेषत: तरुणांचा व पुरुषांचा तरुणीकडे किंवा स्त्रीकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलतो.

रक्षाबंधनामागील उद्देश, अर्थ व कारण तसेच राख्यांचे महत्त्व
१. उद्देश
         `रक्षाबंधन' हा भारतीय संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी बहीण भावाला तिचे रक्षण करण्यासाठी अतूट बंधनात बांधते.

२. अर्थ व कारण
अ.`बहिणीचे जन्मोजन्मी रक्षण करणार आहे', हे सांगून त्याचे वचन म्हणून भाऊ बहिणीकडून धागा बांधून घेतो व त्याला वचनबद्ध करण्यासाठी बहीण धागा बांधते. `बहीण व भाऊ यांनी नात्याच्या बंधनात रहावे' यासाठी हा दिवस इतिहास कालापासून प्रचलीत आहे.
आ. राखी हे बहीण व भाऊ यांच्या पवित्र बंधनाचे एक प्रतीक आहे.
इ. जसे बहिणीच्या रक्षणार्थ भाऊ धागा बांधून घेऊन वचनबद्ध होतो, तसे बहीणही भावाचे रक्षण व्हावे, म्हणून ईश्‍वराच्या चरणी विनवणी करते.
राख्या कशा असाव्यात ?
           राख्यांमधील लहरींचा बहीण व भाऊ या दोघांना फायदा होतो. त्यामुळे दिखाऊ राख्या घेण्यापेक्षा ईश्‍वरीतत्त्व टिकवून ठेवणार्‍या राख्या घेतल्या पाहिजेत, अन्यथा त्या राख्यांमधील त्रिगुणांचा जिवांवर परिणाम होऊन त्यांची तशी वृत्ती बनण्यास मदत ठरते.

पाटाच्या भोवती रांगोळी काढण्याचा उद्देश
         राखी बांधतांना भावाला बसण्यासाठी ठेवलेल्या पाटाच्या भोवती सात्त्विक रांगोळी काढावी. अशा सात्त्विक रांगोळीतून सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होतात. त्यामुळे तेथील वातावरण सात्त्विक बनते.

तुपाच्या निरांजनाने ओवाळणे
         राखी बांधल्यावर भावाला तुपाच्या निरांजनाने ओवाळतात.तुपाची ज्योत शांतपणे तेवत रहाते. त्यामुळे भावात शांतपणे विचार करण्याची बुद्धी वाढण्यास मदत होते.

ओवाळायच्या ताटात मौल्यवान वस्तू न ठेवण्याचे कारण
         ओवाळायच्या ताटात पैसे अगर मौल्यवान वस्तू ठेवू नयेत. ताटात अशा प्रकारच्या वस्तू ठेवल्याने बहिणीत त्या विषयी अपेक्षा निर्माण होऊन तो संस्कार वाढतो. त्यामुळे तिच्यात रज-तमाच्या संस्कारांचे प्रमाण वाढत जाऊन भाऊ-बहिणीत कलह निर्माण होऊन तिच्यातील प्रेम कमी होते.

बहिणीने भावाला राखी बांधतांना द्रौपदीप्रमाणे भाव ठेवावा
          श्रीकृष्णाच्या बोटातून वाहणार्‍या रक्‍तप्रवाहाला थांबविण्यासाठी द्रौपदीने तिच्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला. बहीण भावाला होणारा त्रास कदापी सहन करू शकत नाही. त्याच्यावर आलेले संकट दूर करण्यासाठी ती काहीही करू शकते. राखी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावाला राखी बांधतांना हाच भाव ठेवला पाहिजे.

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने कोणतीही अपेक्षा न बाळगता राखी बांधण्याचे महत्त्व
         रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाकडून वस्तूच्या रूपात कोणतीही अपेक्षा मनात बाळगल्यास ती त्या दिवशी मिळणार्‍या आध्यात्मिक फायद्यापासून वंचित रहाते. हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या देवाण-घेवाण हिशोब कमी करण्यासाठी असतो.

पुढील काळात प्रत्येक जिवाने करावयाचे प्रयत्‍न
अ. या दिवसाची आठवण ठेवून बहीण-भावाचे बंधन अतूट ठेवण्याचा प्रयत्‍न करणे
आ. समाजातील इतर जिवांशी अतूट बंधन ठेवण्याचा प्रयत्‍न करणे
इ. ईश्‍वरावरील श्रद्धा वाढवण्याचा प्रयत्‍न करणे
संदर्भ : ' सण,धार्मिक उत्सव व व्रते '

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top