माझ्या मनातील प्रत्येक भाव तू ओळखला आहेस. तुझ्यापासून काहीच लपून राहिलेलं नाही. तुझ्याही मनात माझ्याबद्दल प्रेम, आस, कोमल भावना आहे. माझ्याही मनात तेच आहे. तरीही आपण दूर आहोत. का? कशासाठी? या भेकड समाजासाठी की या समाजाला घाबरणाऱ्या आपल्या आईवडिलांसाठी? कुणी बनवला हा समाज? आपणच. मग याला का घाबरायचं? तुझी आणि माझी जात वेगळी आहे, म्हणून आपण दूर-दूर राहायचं? मला नाही पटत हे सगळं. खरं सांगू, हे सगळं मी तुच्छ मानते. या जगात सर्वश्रेष्ठ मैत्री आणि प्रेम या दोनच गोष्टी खऱ्या आहेत. त्या नि:स्वाथीर् असतात आणि जर या गोष्टी नि:स्वाथीर् नसतील, तर त्या खऱ्याही नसतात. तुझ्या प्रेमात पडल्यापासून मी बरंच काही शिकले. प्रेम सगळं शिकवतं, असं म्हणतात ना, ते खरं असल्याचं मी अनुभवलं. तुझ्या प्रेमाने मला कवी बनवलं. सहनशील, स्वतंत्र विचारसरणीचं नम्र व्हायला लावलं. स्पर्शाशिवायही आधार देता येतो, याची तुला उत्तम जाणीव आहे. तुझा बोलका चेहरा सतत माझ्यासमोर असतो आणि तो पाहून माझी लेखणीही उत्तर देऊ लागते. तुझं ते गोड हसणं पाहून कुणी फिदा नाही झालं, तरच नवल. तुझा खेळकर स्वभाव कुणालाही आपलंसं करतो. तुझ्या शुद्ध आणि नि:स्वाथीर् हसऱ्या-गोड स्वभावामुळेच मी तुझ्यात कधी गुंतत गेले, कळलंच नाही. कदाचित आपलं प्रेम मोठ्यांच्या नजरेत चुकीची गोष्ट असेल. पण प्रेम करताना मी त्यांची परवानगी घेतली नव्हती. आताही मी घाबरत नाही. तुझा स्वभाव 'मोडेन पण वाकणार नाही,' असा आहे. मग आपण चुकत नसलो, तर भीती कशाची? प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाचे गोड क्षण येतात. ते लग्नाआधी आले, तर त्याला मान्यता मिळत नाही. का? ते मलाही माहीत नाही. पण मला इतकं नक्कीच ठाऊक आहे, की तू माझा आहेस... फक्त माझा! आयुष्यात प्रत्येकाने एकदा प्रेम केलंच पाहिजे, लोकं म्हणतात, प्रेम ही एक सजा आहे, पण त्यांना कुठे ठाऊक असतं, की झुरण्यात काय मजा आहे...

- फक्त तुझीच,
कीर्ति 

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top