१५ ऑगस्ट ना मित्रा.
आनंदाने भरून आलाय ऊर.
पण घरीच सुट्टी एन्जॉय करूया
झेंडावंदनाचं ठिकाण आहे दूर..


 १५ ऑगस्ट ना मित्रा,
सांग भारतात स्टेट्स आहेत किती ?
असतील पंचवीस तीस.
आपल्याला स्टेट्स म्हणजे यु.एस. एवढंच माहिती..!


 १५ ऑगस्ट ना मित्रा,
सांग वंदे मातरम कुणी बरं लिहिलंय ?
कुणी लिहिलंय ते ठाऊक नाही
पण ए. आर. रेहमानने काय गायलंय !

पण सोड ना हे प्रश्न
यांची आता काय गरज !
"कौन बनेगा करोडपती" संपून
झालेत बरेच दिवस !


 १५ ऑगस्ट ना ,
मग आश्वासनं आणि स्वप्नं विका.
ठाऊक आहे उद्याच पडणार
त्यांचा रंग फ़िका..!


१५ ऑगस्ट ना ,
मग म्हण "विविधतेत एकता".
वर्षभर मग हवी तेवढी
चिखलफ़ेक करू शकता..!


 १५ ऑगस्ट ना ,
"मेरा भारत महान" जगाला ओरडून सांग .
उद्या लावायचीय व्हिसासाठी,
अमेरिकन वकिलातीसमोर रांग.


 १५ ऑगस्ट ना ,
चल इतिहास आणि संस्कृतीवरची धूळ एका दिवसापुरती झटकूया .
आणि चटावरच्या श्राद्धासारखे
सत्कार समारंभ उरकूया .

काळजी करू नकोस,
असंच करत करतच या देशाने गाठलीय साठी.
छापील भाषण मात्र जपून ठेव,
पुढच्या १५ ऑगस्ट्साठी..!



टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top