तीचं त्याच्यावर अफाट प्रेम. पण ते व्यक्त न करता मनात उगाचच कुढत
राहायचं. मीच का त्याला प्रपोज करावं, या भावनेमध्ये अहंकारही असतो आणि
नकाराची भीतीही!
पाऊस वेशीवर येऊन थांबलाय, आभाळ ढगांनी ओथंबलंय, कसलीशी हुरहुर मनात
दाटलीय... जून सुरू झालाय आणि कॉलेज कॅम्पसमध्ये मन पुन्हा पुन्हा फिरून
येतंय. फायनल एक्झामनंतर दोन-अडीच महिन्यांचा विरह आता मिटू पाहतोय...
त्याच्या प्रेमळ आठवणी मनात भरून राहिल्यात, किमान या पावसात तरी तो
प्रपोज करेल का, या प्रश्नाचा भुंगा मन पोखरतोय... गेलं वर्षभर नजरानजर
होताना प्रेमाची देवघेव होत राहिली पण, ती आता शब्दांत तो मांडेल का, या
विचारात ती आहे...
तो आवडतो, त्याच्याशी बोलावसं वाटतं, त्याने आपल्याशीच बोलावं, किमान
जास्त बोलावं, आपल्यालाच महत्त्व द्यावं असं सतत वाटत राहतं... हेच प्रेम
आहे हे कळतं. कधीतरी त्याच्या डोळ्यांमध्येही चमक दिसते, तो कधी विचारेल,
प्रपोज करेल याची वाट पाहत झुरणं नशिबी येतं... दिवस पुढे जात राहतात पण,
तो काही विचारायचं नावच काढत नाही, कदाचित नकार मिळण्याच्या भीतीने... मग
तीच त्याला प्रपोज करायचं ठरवते, पण... हा 'पण'च मध्ये येतो आणि ती केवळ
वाट पाहण्यावरच समाधान मानते.
९९ टक्के वेळा तोच तिला प्रपोज करतो. तिने त्याला प्रपोज करण्याचं प्रमाण
एखाद टक्क्याहूनही कमीच. तो प्रपोज करत नाही आणि मुलगी तो सल आयुष्यभर
मनात ठेवून कुढत राहते.
एखादा मुलगा आवडूनही त्याच्याकडे प्रेम व्यक्त करणं मुलींना का जमत नाही?
शिक्षणात, करिअरमध्ये मुली पुढे गेल्या तरीही आज यात बदल झालेला नाही, हे
विशेष. मुलींना सतत दडपणात राहावं लागतं, तिच्या भावना मोकळेपणाने व्यक्त
करू शकत नाही, तिच्यावर 'वाईट चालीची' म्हणून शिक्का बसतो, अशी कारणं
पूवीर् दिली जायची. आजही या कारणांमधून मुलींची सुटका झालेली नाही.
मुलींना एक्स्पोजर मिळतंय, भरपूर शिक्षण आणि करिअरच्या संधी, भरभक्कम
पगारही सोबतीला आहे, पण मानसिकता मात्र बदललेली नाही. प्रेमात आणि
लग्नाच्या मागणीत पुरुषानेच पुढाकार घ्यावा, असा पुरुषप्रधान समाजाचा
घालून दिलेला नियम सर्वचजणी तंतोतंत अंमलात आणतात. 'मी विचारलं तर लोक
काय म्हणतील', हा सोशल स्टीग्माही मुलींच्या मनात असतो. एखाद्या
प्रेमविवाहात मुलीने मुलाला प्रपोज केल्याचं कळलं तर, ही मुलगी नक्कीच
'चालू' असणार, किंवा जरा 'ज्यादा'च दिसते, अशा प्रतिक्रिया उमटतात.
घरातल्या आणि समाजातल्या संस्कारांचा पगडा मुलींना बाजूला करता येत नाही,
ही वस्तुस्थिती आहे. आपल्या समाजात अजूनही प्रेमाला फारशी प्रतिष्ठा
नाही, तरीही मुली प्रेम करतात पण, व्यक्त करण्याच्या वेळी सामाजिक बंधनं
वगैरे मध्ये आणतात. याच्यामागे इगो प्रॉब्लेमही असतो! मी कशाला त्याला
विचारू, तो नाही म्हणाला तर? तो पराभव कसा पचवावा? त्यापेक्षा त्याला
विचारू दे! नकाराची भीती दोघांनाही असते पण इगो प्रॉब्लेमही असतोच. काही
वेळेला यामागे अनुभवाची शिदोरीही असते. सीनिअर मुलींचा, ताईचा, वहिनीचा,
मैत्रिणींच्या मैत्रिणींचा अनुभव. एखाद्या मुलीने प्रपोज करून मग दोघांचं
प्रेम जमलं आणि लग्न झालं की पुढे आयुष्यभर नवऱ्याकडून ते ऐकून घ्यावं
लागतं. काही भांडण झालं की, 'मी नव्हतो आलो तुझ्याकडे, तूच आली
होतीस...', हे एवढ्या वेळा ऐकावं लागतं की लग्नाशिवाय राहिलो असतो तर बरं
झालं असतं असं वाटायला लागतं. याचा विचार करून अनेकजणी प्रपोज करण्याचा
विचार मनातच ठेवत असतील किंवा कदाचित असंही होत असेल की, त्यांनी
विचारायच्या आधी मुलंच अधीर होत असतील प्रपोज करायला!
हे पावसाळी धुंद-कुंद वातावरणही आहे प्रेमात पडायला आणि ते व्यक्त करायला
लावणारं... मग आता येणाऱ्या पावसात विचारूनच टाका... नाहीतर मग पुढच्या
वषीर् जेव्हा ढग दाटून येतील, तेव्हा पुन्हा एकदा आठवणींनी मन भरून येईल
आणि एकच प्रश्न सतावेल,

का विचारलं नाही?

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top