तु निघुन गेलीस
कळलेच नाही जाताना
जगच बदलेल माझे
कळले नाही तुझ्याकडे बघून हसताना……..

रडू नकोस  उगीच
चांगले नाही ते  जाताना
माझे रडणे राहूनच गेले
तुला सगळे समजावताना…………….

आभाळं  भरले आहे
अगदी जसे होते तु जाताना
पण आता तेही बरसत नाही
उगीचच कारण नसताना………………..

अजूनही  जातो त्याच  बागेत
रातराणी फ़ुलताना
पण मला फ़क्त दिसते
सकाळी ती कोमेजताना……………….

झालेच नाही आपले बोलणे
सगळा एकान्त असताना
आज सगळं सुचत जातय
एकटा कविता करताना…………….

माहीत  नाही पुन्हा  कधी भेटु
वेगळ्या  रस्त्यावर चलताना
अन जुळतील का आपल्या तारा
वेगळ्या जगात राहताना…………..

विषय  शोधावे लागतील  आता
संभाषण चालु असताना
सगळे तसेच राहील   का गं
पुन्हा एकत्र असताना…………………

शुन्यच आहे आयुष्य माझे
उणे तु असताना
धरलास का हात सांग  तु
सोडुनच जायचे असताना……………

सोन्यासारखा  संसार करशील
दिल्या घरी नांदताना
सांग माझी आठवण येइल का तुला
ती बागेतली रातराणी फ़ुलताना……….

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top